ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱयांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱयाचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते आज (26 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱयांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱयांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱयांच्या निधनामुळे ओढवणाऱया आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱयांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021’ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होणार आहेत.