माजी केंद्रीय मंत्री एम पल्लमराजू यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सध्या जमिनीसह आकाश आणि पाताळसुद्धा विकायला काढले आहे. त्यातूनच देशाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत मोठमोठय़ा सरकारी मालमत्ता खाजगी कंपन्यांच्या आणि खास करून आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालत सुटले आहे, अशी जोरदार टीका माजी केंद्रीय मंत्री एम एम पल्लमराजू यांनी केली आहे. विद्यामन सरकारची ही संपूर्ण कृती म्हणजे आतापर्यंतचे सर्वात मोठे अराष्ट्रीय कृत्य आहे, असेही ते म्हणाले.
मनमोहन सिंग मंत्रिमंडळात ते मानव संसाधन विकास खात्याचे मंत्री राहिलेले पल्लमराजू हे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून मंगळवारी ते पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी यांनी विक्रीस काढलेल्या काही महत्वपूर्ण मालमत्तामध्ये 27 हजार किमी महामार्ग, 6 हजार मेगावॅट वीज निर्मिती व 28 हजार किमी वीज वाहिन्या, 8 हजार किमी गॅस पाईपलाईन, 210 लाख मेट्रीक टन धान्य कोठारे, 2.86 लाख किमी. टेलिकॉम फायबर व 15 हजार टेलिकॉम टॉवर, 25 विमानतळ, 9 बंदरे, 761 मायनिंग ब्लॉक, 2 राष्ट्रीय स्टेडियम आणि सुमारे 1.52 लाख कोटी किंमतीची 400 रेल्वे स्थानके, 150 रेल्वे गाडय़ा, रेल्वे लाईन्स, यासारख्या काही मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती पल्लमराजू यांनी दिली.
वरील सर्व राष्ट्रीय मालमत्तांची किंमत सुमारे सहा लाख कोटी रुपये होत असून त्यांच्या उभारणीसाठी गत कित्येक सरकारना सुमारे 67 वर्षांचा कालावधी लागला होता. मोदी सरकार आपल्या सत्तेच्या अल्पकाळात एका झटक्यात या मालमत्तांची विक्री करण्यास सरसावले आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे हे सर्व प्रयत्न दोन बडय़ा उद्योगपतींच्या हितासाठीच चालले असून या सरसकट विक्री प्रक्रियेदरम्यान नुकसानीतील मालमत्तांबरोबरच फायद्यात असणाऱया मालमत्ताही कवडीमोलाने धनदांडग्यांच्या घशात घालण्यात येणार आहेत, असा दावाही पल्लमराजू यांनी केला.
सध्याचे अकार्यक्षम सरकार आणि त्यांचे निवडक अधिकारी मिळून संगनमताने देशविक्रीत गुंतले असून रेल्वे, बंदरे, महामार्ग, गॅस पाईपलाईन, वीज वितरण, टेलेकॉम टॉवर, स्टेडियम यासारख्या नवरत्न मालमत्ता स्वतःच्या क्रोनी मित्रांना बहाल करणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या मालमत्ता खरेदीसाठी हे धनदांडगे उद्योगपती कर्जाच्या नावाखाली सार्वजनिक बँकांमध्ये असलेल्या लोकांच्या घामाकष्टांच्या पैशांचा वापर करणार आहेत. म्हणजेच ’सार्वजनिक निधीतून सार्वजनिक मालमत्तांची खरेदी’ असाच हा प्रकार होणार असल्याचेही पल्लमराजू म्हणाले.
पत्रकार परिषदेस व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, तुलिओ डिसोझा, आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.