वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील बुधवार व रविवार भरणाऱ्या किरकोळआठवडा बाजारात मोबाईल चोरट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून. गेल्या एक महिन्या भरात जवळजवळ दहा ते बारा नागरिकांचे मोबाईल बाजारात भाजीपाला खरेदी करत असताना गेल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी सदर मोबाईल चोरट्यांना बराच वेळा कुंभोज ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते परंतु केवळ कागदोपत्री तक्रार नोंदवून सदर चोरट्यांना सोडून देण्यात येते. त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई केली जात नाही. याचाच गैरफायदा म्हणून कुंभोज आठवडी बाजारात गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल चोरट्यांची टोळी कार्यरत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन असणाऱ्या मुलांची तसेच काही महिलांची टोळी कुंभोज आठवडा बाजारात प्रत्येक बुधवारी दर रविवारी दाखल होते. सदर अल्पवयीन मुले जाता जाता नागरिकांच्या खिशातून किंमतीने जास्त असणारे मोबाईल चोरून घेऊन जातात ,त्याचा पत्ता ही नागरिकांना लागत नाही.
परिणामी याबाबत काही वेळा सदर अल्पवयीन मुलांना नागरिकांनी पकडून चांगला चौप दिला आहे. व सदर चोरांना पकडून हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. परंतु सदर चोराच्या आधी सदर चोराचे वकीलच हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतात व सदर गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवतात ,यामुळे कुंभोज ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, हातकणंगले पोलिसांनी सदर चोरांचा बंदोबस्त करावा व मोबाईल चोरीसाठी कार्यरत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावाअशी मागणी नागरिकांतून होत आहे.