स्थानिक समस्या जाणून घेण्याच्या मोदींचा ‘मास्टरप्लान’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोदी सरकारमधील 70 केंद्रीय मंत्री 10 सप्टेंबरपासून जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत. या मंत्र्यांनी राज्यातील स्थानिक जनतेशी थेट संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घ्यावी, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. स्थानिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्यासह राज्यातील विकासकामे आणि प्रकल्पांचा आढावा घेण्याची सूचनाही सर्व मंत्र्यांना करण्यात आल्याचे समजते. पुढील आठवडय़ातच या कामाला सुरुवात होणार असून पुढील 9 आठवडय़ांच्या आत केंद्र सरकारला हे उद्दिष्ट यशस्वी करायचे आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱयादरम्यान जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. या जनता दरबारांच्या माध्यमातून मंत्रीमहोदय विकासकामांचाही आढावा घेतील. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीदेखील घाटीला भेट देण्याची शक्मयता असल्याचे भाजप नेते रवींद्र रैना यांनी सांगितले. अलिकडेच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीद्वारे संवादाचा मार्ग आधीच उघडला गेला आहे, आता या नवीन मिशन अंतर्गत घाटीमध्ये विकासाची गती वाढवण्यावर भर दिला जात आहे.
केंद्राच्या सर्व योजनांचा थेट लाभ तेथील लोकांना मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी जानेवारी 2020 मध्येही 36 केंद्रीय मंत्र्यांच्या चमूने जम्मू काश्मीरला भेट दिली होती. त्या दौऱयावेळीही लोकांशी थेट संवाद साधण्याचा आणि ग्राऊंड पातळीवरील समस्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न होता. आता पुन्हा सरकार हाच मार्ग अवलंबत असल्याचे दिसते.