नागरिकांत घबराट, केंद्रबिंदू पश्चिमेला 19 किलोमीटरवर कळेनजीक
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला शनिवारी मध्यरात्री भुकंपाचा सौम्य धक्का बसला. या धक्क्याने नागरिकांत घबराट पसरली. या 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू शहराच्या पश्चिमेला 19 किलोमीटरवर कळेनजीक होता, अशी माहिती येथील भूकंपमापन केंद्रातून देण्यात आली.
कोल्हापूर शहरात शनिवारी रात्री 11 वाजून 51 मिनिटांवर भुकंपांचे 3 सौम्य धक्के बसले. त्यातील 3.9 रिश्टर स्केलचा धक्का अधिक जाणवला. त्यामुळे भीतीने काहीजण घराबाहेर आले. रविवारी दिवसभर या भूकंपाच्या धक्क्याची चर्चा होती. या भुकंपाच्या धक्क्याचा केंद्रंबिंदू कोल्हापूरच्या पश्चिमेला पन्हाळा तालुक्यात होता. तसेच शहरापून 19 किलोमीटवर कळे ते पणुत्रेदरम्यान भुगर्भात 38 किलोमीटर खोलीवर या भुकंपाचा केंद्रबिंदू आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, रविवारी पहाटे 3 वाजून 21 मिनिटांनी कोयना धरण परिसराला 2.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. कोयनानगर येथून पश्चिमेला रत्नागिरी जिल्ह्यातील खोवी गावाच्या ईशान्येला भुगर्भात 14 किलोमीटर खोलीवर त्याचा केंद्रबिंदू आहे. पण तो कोयना परिसरात जाणवला नसल्याची माहिती देण्यात आली.