बहुतांश तक्रारी उत्तरप्रदेशातून – महिला आयोग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय महिला आयोगाने 2021 च्या 8 महिन्यांमध्ये महिलांच्या विरोधातील गुन्हय़ांच्या तक्रारींमध्ये 46 टक्क्यांची वाढ झाल्याचे मंगळवारी सांगितले आहे. यातील निम्म्याहून अधिक तक्रारी उत्तरप्रदेशातून प्राप्त झाल्या आहेत. आयोग नियमित स्वरुपात जागरुकता मोहीम चालवत असल्याने तक्रारी वाढत असल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे.
जानेवारी ते ऑगस्टदरम्यान महिलाविरोधी गुन्हय़ांच्या 19,953 तक्रारी मिळाल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत या तक्रारींचा आकडा 13,618 इतका होता. जुलै महिन्यात 3,248 तक्रारी प्राप्त झाल्या, हा आकडा जून 2015 नंतर एखाद्या महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ठरला आहे.
चालू वर्षातील 8 महिन्यांमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी 7,036 तक्रारी प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराच्या तरतुदीच्या अंतर्गत नोंदविण्यात आल्या आहेत. तर 4,289 तक्रारी घरगुती हिंसाचार आणि 2,923 तक्रारी विवाहानंतर महिलांच्या छळाशी संबंधित होत्या.
उत्तरप्रदेशातून सर्वाधिक 10,084 तक्रारी मिळाल्या आहेत. त्यानंतर दिल्लीतून 2,147 तर हरियाणातून 995 आणि महाराष्ट्रातून 974 तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत.