सांगली / प्रतिनिधी
महापूर अतिवृष्टी आणि चक्रीवादळ अशा संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायतीला हेक्टरी एक लाख तर जिरायतीला 50 हजार भरपाई द्या अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार कडे केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्रातील बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करत आहे. अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळ यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी ढगफुटीमुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ, महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे.
त्या शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये व कोरडवाहूसाठी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व १०० % विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांना विमा देण्याची सोय करावी. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे चालू पिक कर्ज सरकारने तात्काळ माफ करावे अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.