प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढू लागला असून शनिवारी सायंकाळपर्यंत धरणात प्रतिसेकंद 30 हजार 92 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत पाणीसाठा 102 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान, पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण राज्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी दिवसभर तर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने राज्याची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढू लागला आहे. चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढून प्रतिसेकंद 30 हजार 92 क्युसेक वेगाने ही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱया कोयना धरणात 24 तासांत दोन टीएमसीने वाढ झाली. शनिवारी सायंकाळी पाणीसाठा 102 टीएमसी झाला आहे. आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 3.25 टीएमसी पाण्याची गरज आहे. अद्यापही पावसाचा एक महिना बाकी असल्याने पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करून धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना 17 (3945), नवजा 18 (5192) आणि महाबळेश्वर येथे 31 (5216) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणाची पाणीपातळी 2161 फूट झाली आहे.