केजरीवालांकडून भाजप लक्ष्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाला कथितरित्या बनावट कंपन्यांकडून देणगी स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यावर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप घाबरला असून याचमुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा दावा केला आहे. या नोटीसमुळे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय वाप्युद्ध तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
ईडीने 2017 मध्ये 4 बनावट कंपन्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या कंपन्यांवर आम आदमी पक्षाला प्रत्येकी 50 लाख रुपयांची देणगी दिल्याचाही आरोप आहे.
दिल्लीत आम्हाला प्राप्तिकर विभाग, सीबीआय, दिल्ली पोलिसांनी हरविण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही 62 जागा जिंकण्यात यशस्वी ठरलो. पंजाब, गोवा, उत्तराखंड, गुजरातमध्ये आम्ही जोरदार वाटचाल करत असल्यानेच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. भारताचे लोक प्रामाणिक राजकारण इच्छित आहेत. भाजपच्या या दबावतंत्रामुळे आम्ही अधिक मजबूत होऊ, असे केजरीवालांनी नोटीसप्रकरणी केंद्राला प्रत्युत्तर देत म्हटले आहे.