लाभार्थ्यांना ई-केवायसी 15 सप्टेंबरपर्यंत करून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याने सुरू केलेल्या ई-केवायसीची (बायोमेट्रीक ठसे) मुदत पुन्हा वाढविली आहे. रेशन दुकानदारांकडून आता लाभार्थ्यांची 15 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करून घेतली जाणार आहे. शिवाय त्यानंतर दररोज 12 ते 4 यावेळेत ई-केवायसीचे काम चालणार आहे. संबंधित रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे.
मागील काही दिवसांपासून अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत ई-केवायसीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कोरोनामुळे या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. तसेच काही लाभार्थ्यांच्या अंगठय़ांचे ठसे उमटत नाहीत तर काही ठिकाणी सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ई-केवायसीचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे खात्याने पुन्हा ई-केवायसीची मुदत वाढवून दिली आहे.
विवाह, मृत्यू आणि स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाने आलेल्या रेशनमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. मात्र अद्यापही बऱयाच लाभार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 70 टक्केच ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची मुदत वाढविली आहे.