गटारीच्या अर्धवट कामामुळे गैरसोय : व्यावसायिक-नागरिकांना धोकादायक, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे कासवगतीने
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे करण्यात येत असून आरटीओ चौक ते अशोक चौक पर्यंतच्या भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी चरी खोदून ठेवण्यात आल्याने व्यावसायिक व नागरिकांना धोकादायक बनले असल्याने तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे सुरू करून चार वर्षे होत आली, पण अद्यापही काही कामे सुरू आहेत. सध्या संगोळी रायाण्णा चौक ते अशोक चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आरटीओ चौक ते अशोक चौक पर्यंतच्या भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण गणेशोत्सवामुळे काही कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सदर काम देखील बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या चरीचा फटका आरटीओ चौक ते अशोक चौकपर्यंतच्या व्यापाऱयांना बसला आहे. तसेच ग्राहकांनादेखील याचा त्रास होत असल्याने गटारीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठय़ा चरी असल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. काही व्यावसायिकांनी या चरीवर साकव घातले आहे, पण वृद्ध व लहान मुलांना यावरून ये-जा करता येत नसल्याने अडचणीचे बनले आहे.
वाहनधारकांना धोकादायक
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी सदर विकासकामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर माती टाकण्यात आली असून वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना त्रास होत असून धोकादायक बनले आहे. दुचाकीधारक घसरून पडत आहेत. त्यामुळे सदर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.