लडाख येथे आले होते विरमरण, आसले शोकसागार बुडाले
प्रतिनिधी/ वाई,
लडाख येथे विरमरण आलेल्या आसले (ता. वाई) येथील सोमनाथ मांढरे या हुतात्मा जवानाच्या पार्थिवावर सोमवारी आसले (ता. वाई) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस व सैन्यदलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्या व शोक अवस्थेत बिगुल वाजवून मानवंदना दिली. शहीद जवान सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर हुतात्मा सोमनाथ यांचा आठ वर्षाचा मुलगा यश याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.
यावेळी सहकार व पणन तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, सभापती संगिता चव्हाण यांनी शहिद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
शहीद जवान सोमनाथ मांढरे यांचे आसले गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील, आमदार श्री. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.
सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्राला लडाख येथे वीरमरण आले होते. हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध झाले होते. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देशसेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीरमरण आले.
वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती मिळाली. आसले (ता वाई) येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती कळविण्यात आली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव विमानाने दिल्ली येथे पोहोचले व तिथून ते त्यांच्या आसले या मूळ गावी पोहोचले. गेल्या पंधरा दिवसापूर्वी सोमनाथ मांढरे हा आसले या आपल्या गावी आला होता व पाचच दिवसापूर्वी सुट्टी संपवून माघारी गेला होता. वाई तालुक्यातील जनतेने शोक अवस्थेत आपल्या लाडक्या हुतात्मा जवानाला अखेरचा निरोप दिला.