कर्नाटकात विधानसभा निवडणुकीला आणखी दीड वर्षांचा कालावधी आहे. राजकीय पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येते. दावणगेरे येथे भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. याच वेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केलेल्या वक्तव्याभोवती राजकारण रंगले आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काही भाजप आमदारांशी संपर्क साधला आहे. भाजप आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गौप्यस्फोट येडियुराप्पा यांनी केला आहे. यामागे एका दगडात अनेक पक्षी मारण्याची त्यांची योजकता आहे. आपल्याकडे दुर्लक्ष केले गेले तर तुमची खैर नाही, असे हायकमांडला सुचवितानाच काँग्रेस नेत्यांनी जे सुरू आहे, त्यावर आपले लक्ष आहे, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या निजद या प्रादेशिक पक्षालाही मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांच्यासह के. श्रीनिवास गौडा, बेमल कांतराज, एस. आर. श्रीनिवास आदी आमदारांनी निजदला रामराम ठोकून काँग्रेसची कास धरण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तर काँग्रेसमधील आणखी एक नेते एच. एम. रेवण्णा हे निजदच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. जी. टी. देवेगौडा यांनी तर स्वतःच जाहीर केले आहे, ते सध्या निजदचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पराभूत करून ते आमदार झाले आहेत. पक्षात आपल्याला योग्य स्थान मिळत नाही म्हणून निजद नेतृत्वावर ते नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नशीब आजमावण्याचे त्यांनी ठरविले आहे. निजद सोडण्याची तयारी करणाऱया प्रत्येकाचे म्हणणे एकच आहे, आम्ही कौटुंबिक राजकारणाला कंटाळलो आहोत.
अलीकडच्या वर्षात कर्नाटकात निधर्मी जनता दल हा नशीबवान पक्ष समजला जातो. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नाही तरी सत्तेवर कोण येणार? हे ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. 40 ते 45 तुटपुंज्या जागा मिळवूनही ते किंगमेकर ठरतात. नाही नाही म्हणत त्यांनी भाजपशीही दोस्ती केली. या दोस्तीमुळे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून ते वचनभ्रष्ट झाले. हाच मुद्दा पुढे करून येडियुराप्पा यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संख्याबळ मिळवून दिले. याबरोबरच ‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागले. त्यानंतरच्या निवडणुकीत निजदने काँग्रेसबरोबरही घरोबा केला. यावेळीही कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये सिद्धरामय्या आणि त्यांचे पटले नाही. पुन्हा घटस्फोट झाला. आता कर्नाटकाचे हित जपायचे असेल तर प्रादेशिक पक्षाला सत्ता मिळायला हवी, असे सांगत एच. डी. देवेगौडा व एच. डी. कुमारस्वामी यांनी 2023 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
निजदला धक्का देण्याचे काम काही आजी-माजी आमदारांनी केले आहे. एखादा नेता निवडणूक रिंगणात उतरला की त्याच मतदारसंघात त्या नेत्याला पर्याय तयार केला जातो. अंतर्गत धुसफूस सुरू झाली, की त्याला बाजूला काढून पर्यायी नेतृत्व पुढे आणले जाते. या खेळीला आम्ही कंटाळलो आहोत, असे पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या निजद नेत्यांचे म्हणणे आहे. आजवरची निजदची वाटचाल लक्षात घेता असे अनेक धक्के त्यांनी पचवले आहेत. मंडय़ा, म्हैसूर, हासन परिसरात निजदला मोठा लोकाश्रय आहे. उत्तर कर्नाटकात जसे लिंगायत निर्णायक ठरतात तसे दक्षिणेत वोकलिग समाज निर्णायक ठरतो. एच. डी. देवेगौडा हे वोकलिगाचे नेतृत्व करतात. त्यामुळेच काँग्रेसनेही डी. के. शिवकुमार या वोकलिग नेत्याच्या हाती पक्षाची धुरा सोपविली आहे. दलबदलू नेत्यांचे म्हणणे कुमारस्वामी यांना मान्य नाही. पुढील निवडणुकीत आमची ताकद काय आहे? हे आम्ही दाखवतो. ज्यांना स्वार्थ साधायचा आहे, ते पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करीत आहेत. ज्यांना जनसेवा करायची आहे, ते आमच्याबरोबर राहतात. शेवटी व्यक्तीपेक्षा पक्ष हा नेहमी श्रे÷ असतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.
एकीकडे काँग्रेस, भाजप व निजद या तिन्ही पक्षात राजकीय घडामोडी तीव्र झालेल्या असतानाच दुसरीकडे कर्नाटकात दहशतवादी कारवायासंबंधीचा धक्कादायक उलगडा झाला आहे. या वर्षभरात 220 वेळा सॅटेलाईट फोनमधून संभाषण झाले आहे, अशी माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली आहे. तुराया कंपनीचे सॅटेलाईट फोन वापरास बंदी आहे. मात्र, दहशतवादी कारवायात गुंतलेले सर्रास या फोनचा वापर करतात. नवी दिल्ली येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या पाऊलखुणा कर्नाटकात दिसून येत आहेत. खासकरून कर्नाटकातील किनारपट्टी परिसरात आयएसआयचे स्लीपर सेल्स पुन्हा सक्रिय झाले आहेत. कारवार, मंगळूर, चिक्कमंगळूर, भटकळ परिसरातून सॅटेलाईट फोनवरून संभाषण करण्यात आले आहे. केरळ व कर्नाटकाच्या सीमेवर इस्लामिक स्टेटविषयी सहानुभूती असलेला मोठा वर्ग आहे. केरळच्या सीमेवरून बेपत्ता झालेले अनेक तरुण आयएसआयच्या छावणीत आढळले आहेत. आता कर्नाटकासह देशभरातील लष्करी तळांविषयी माहिती मिळविण्यासाठी आयएसआयने हनीट्रपचा प्रकार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. कापड व्यापारी जितेंद्र सिंग याला अटक झाली आहे. जितेंद्र सिंग प्रत्यक्षात कापड व्यापारी असला तरी लष्करी अधिकारी असल्याचे समजून पाकिस्तानच्या आयएसआयने त्याला भारतीय लष्करीतळांची माहिती देण्यासाठी गळ घातली आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्याला हनीट्रपच्या जाळय़ात अडकविण्यात आले आहे. याबदल्यात त्याच्या बँक खात्यात कराचीमधून 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जितेंद्र सिंग हा मूळचा राजस्थानचा. बेंगळूर येथे कापड व्यापार करता करता हनीट्रपच्या जाळय़ात अडकून तो पाकडय़ांसाठी हेरगिरी करू लागला. एखाद्या देशाची लष्करासंबंधीची माहिती मिळविताना सेनादलातील अधिकाऱयांना हनीट्रपच्या जाळय़ात अडकविण्याची पद्धत जुनीच आहे. जितेंद्र सिंग हा सेनादलात नाही हे समजल्यानंतर आयएसआयने त्याच्याशी संबंध तोडून टाकले. सॅटेलाईट फोनचा वापर, आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱया कापड व्यापाऱयाला अटक आदी घटना कर्नाटकात दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल्स सक्रिय झाले आहेत, हेच दर्शविणाऱया आहेत.