दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, जांबोटी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा
कणकुंबी / वार्ताहर
बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत.
गेल्या वर्षभरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. परंतु ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केल्याने रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यानंतर रस्त्यातील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता परंतु केवळ आठच दिवसांमध्ये पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. जीवघेण्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर पुन्हा ठेकेदाराने दगडमाती घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु या मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणच झाली आहे.
विशेषतः कणकुंबी-चोर्ला यापैकी कणकुंबी वनखात्याच्या नर्सरीजवळ, त्यानंतर चोर्ला गावच्या अलीकडील दोन-तीन ठिकाणी वळणावर तसेच चिखलेपासून ते कणकुंबी मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही वेळेला तर खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला जाऊन वाहने पडणे किंवा खड्डय़ात अडकून पडणे अशा घटना वारंवार घडत आहेत. गणेशचतुर्थी दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे तर रस्त्याची वाताहत झाली आहे.
बुधवार दि. 22 रोजी इचलकरंजी येथून युवक जांबोटी-चोर्ला मार्गावरून गोव्याला जात असताना चिखले क्रॉसच्या वळणावर भल्या मोठय़ा खड्डय़ात वाहन गेल्याने वाहनाचा टायर फुटून त्या ठिकाणी अपघात घडला. कसेबसे त्या खड्डय़ातून वाहन बाहेर काढून या सात-आठ युवकांनी रस्त्याच्या बाजूला पडलेले लहान-मोठे दगड गोळा करून दोन चार खड्डे बुजवून टाकले. सामाजिक उपक्रम हाती घेऊन युवकांनी या रस्त्यावरचे दोन-चार खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे जर चार-आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले नाही तर जांबोटी येथे रास्तारोको आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.