एकाने केले दुसऱ्याला रक्तबंबाळ, भरदुपारी प्रकार, प्रकरण पोलीसांच्याही हाताबाहेर , शांततेचा भंग, प्रशासकीय इमारतींमध्ये प्रचंड अस्वच्छता, मालमत्तेचे नुकसान
प्रतिनिधी /इस्लामपूर
शहरात गेल्या वर्षभरापासून पारध्यांचा वावर वाढला आहे. त्यांचे नविन प्रशासकीय इमारत व मध्यवस्तीतील लोकनेते राजारामबापू नाट्यगृह, तहसील कार्यालय परिसरात वास्तव्य आहे. शासकीय इमारतीमधील शांततेचा भंग होताना दिसत आहे. यांच्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. अधिकारी मात्र त्यांच्याकडे कानाडोळा करुन काम आटोपून निघून जात आहेत. मंगळवारी भर दुपारी तहसिल कार्यालयासमोर पारध्यांच्या दोन गटात राडा झाला. एकाने दुसऱ्याला दगड घालून रक्तबंबाळ केले. पोलीस धावले, पण हे प्रकरण त्यांच्या ही आटोक्या बाहेर गेले.
मंगळवार दुपारी एक वाजण्याची वेळ. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने वाढीव घरपट्टी विरोधात नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ही होता. मोर्चा तहसिल कार्यालय चौकातून नगरपालिकेकडे सरकला. आणि अचानक तहसिल कार्यालयाच्या प्रवेशव्दारातच दोन पारधी तरुणात हातघाईची जुंपली. यामध्ये पारधी महिलाही घुसल्या. मोठमोठ्याने आरडाओरडा करत एकाने दुसऱ्याची
दगड व लाथाबुक्यांनी धुलाई केली. यामध्ये तो तरुण रक्तबंबाळ झाला. जखमी पारधी तरुण चोऱ्या करतो आणि पोलीसांचा ससेमिरा आपल्या मागे लागतो, म्हणून त्याच्यावर हल्ला केल्याची चर्चा त्यांच्यात सुरु होती.
पारध्यांच्या या राड्याची माहिती नगरपालिकेत मोर्चाच्या ठिकाणी समजली. बंदोबस्तात असणाऱ्या दोन कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोर धाव घेतली. तिथे बघ्यांच्या गर्दीने वाहतूक खोळंबली होती. पारध्यांची हातघाई दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आटोपण्याच्या पलिकडची होती. पोलीसांनी गर्दी पांगवली. हल्लेखोराने मात्र हाताने मारत त्याला न्यायालयासमोरुन पोलीस ठाण्याकडे नेले. पारध्यांवर कारवाई करण्यात पोलीसांना ही अडथळे येत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून पारधी अधूनमधून बाहेर जावून पुन्हा इस्लामपुरात येवून मुक्काम ठोकतात. नागरिक त्यांच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे त्यांचा दंगा सुरु असतो, एक वर्षापूर्वी पारधी प्रशासकीय इमारत परिसरातील स्टॅम्प व्हेंडर बसत होते, त्या पत्र्याच्या शेडमध्ये मुक्काम ठोकून होते. त्यातील काही पारधी तरुणांनी इमारतीचा मुख्य काचेचा दरवाजा फोडला होता. तर नव्याने झालेल्या तहसिल कार्यालयाच्या आवारात व पार्कीग झोन मध्ये अस्वच्छता करीत आहेत. महसूल अधिकारी व कर्मचारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आणि पोलीस वेळ मारुन नेत आहेत. त्रास मात्र शहरातील नागरिक, व्यवसायिकांना होत आहे.यामुळे पारध्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.