-सरारसी वजन 18.500 किलोग्रॅम -वजन कमी आल्यास माल परत
प्रतिनिधी/कोल्हापूर
बाजार समिती शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गूळ बॉक्सच्या वजनावरुन दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर शुक्रवारी तुर्तास पडदा पडला. गुळासह बॉक्सचे वजन ग्राह्य धरण्याचा निर्णय शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गूळाच्या बॉक्सचे सरासरी 18. 300 ते 18.500 किलोग्रॅम वजन असावे, त्या खाली आल्यास व्यापाऱ्यांनी माल घेऊ नये असा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
गूळाचा सौदा झाल्यानंतर गुळाच्या निवळ वजनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत होते त्यामुळे गूळ पॅकिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या प्रति बॉक्सचे 20 ते 22 रुपये शेतकऱ्यांना सोसावे लागत होते. ही भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे गुरुवारी शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी होती. शुक्रवारी बाजार समितीच्या मुख्यालयात बैठक झाली. यावेळी सर्वानुमते हा तोडगा काढण्यात आला.
बैठकीला गूळ विभाग प्रमुख के. बी. पाटील, संचालक दगडू भास्कर, अजित पाटील, कल्याणराव निकम, विश्वास पाटील, बी. एच. पाटील, दिगंबर पाटील शेतकऱ्यांच्यावतीने सचिन पाटील, सचिन चौगले, अजित पाटील, तर व्यापाऱ्यांच्यावतीने अतुल शहा, विक्रम खाडे, रमनभाई, यशवंतलाल शहा उपस्थित होते