प्रतिनिधी / जयसिंगपूर
मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांची घोर फसवणूक झाली असून शेतकर्यांना गुठ्यांला केवळ 135 रूपये मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याचा तीव्र निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील स्टॅण्ड चौकात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करून शंखध्वनी करण्यात आले.
यावेळी बोलताना सावकर मादनाईक म्हणाले की, सन 2019 प्रमाणे पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चिखली ते नृसिंहवाडी अशी आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. हजारो पूरग्रस्त यामध्ये सामील झाले होते. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेऊन सन 2019 प्रमाणे शेतकर्यांना मदत देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द फिरवत खोटारडेपणा सिध्द केला.
पूरग्रस्तांच्या मदत देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एकाच दिवशी आम्हाला अंधारत ठेवत दोन बैठका घेतल्या. सकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतील कोणताही निर्णय आम्हास सांगितला गेला नाही. त्यानंतर दुपारी 3 वाजता सह्याद्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सन 2019 प्रमाणे सर्वांना नुकसान भरपाई देण्याचा आमचा निर्णय झाला आहे. तुम्ही आंदोलन करण्याची गरज नाही. नियमित कर्जदारांना 50 हजार रूपये प्रत्येक खातेदारालाही देणार आहेत. हे सरकार शेतकर्यांना न्याय देणारे आहे. असे सांगून आम्हाला बैठकीत आश्वस्त केले होते. मात्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारचा ढोंगीपणा सिध्द झाला आहे. याची जबर किंमत राज्य सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी दिला गेला.
यावेळी आदिनाथ हेमगिरे, राम शिंदे, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, रामचंद्र फुलारे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, राजू नरदे, वासूदेव भोजणे, विश्वास बालिघाटे, अजित शिंदे, सचिन काडगे आदी उपस्थित होते.