गुजरात/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुजरातमधील (Gujarat) एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूरतमधील सौराष्ट्र पटेल सेवा समाजाकडून उभारण्यात येणाऱ्या हॉस्टेलचं भूमीपूजन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना म्हटलं, की जागतिक संस्थेनंसुद्धा म्हटलंय, की कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील निर्बंध, टाळेबंदी याचा फटका जगभरात सर्वत्र बसला होता. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला होता. कोरोनावर लस विकसित झाल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने जगभरातील अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा सुरु झालं असलं तरी अनेक देश अजूनही धक्क्यातून पुरेसे सावरले नाहीत. असं असतांना भारताची अर्थव्यवस्थेची जोरदार आगेकुच सुरु असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मोदी म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळानंतरही देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. अर्थव्यवस्था (indian economy) पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला आता आशा आहे. नुकताच एका जागतिक संस्थेनंसुद्धा म्हटलं, की भारत पुन्हा एकदा जगातील वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करताना मोदींनी म्हटलं की, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रम हे प्रादेशिक भाषेत शिकण्याचा पर्याय आहे. आता शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही तर शिक्षणाला कौशल्याशी जोडलं जात आहे. देश आपल्या परंपरागत कौशल्यांना आता अधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत आहे.