ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे दक्षिण आणि मध्य केरळमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण बेपत्ता झाले आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचल्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अन्य सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता लष्कराला पाचारण करण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यानुसार लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे. एनडीआरएफच्या 7 पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.