आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत
प्रतिनिधी/मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नियमात शिथिलता देताना लसीचे दोन डोस बंधनकारक आहेत. मात्र रुग्णसंख्या घटत राहिल्यास दोन डोसची अट शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे एका कार्यक्रमात दिले. दिवाळीनंतर राज्यात एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास आणि मॉलमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरणही वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. पण रुग्णसंख्या घटत राहिल्यास एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत आरोग्य मंर्त्यांनी दिले आहेत.
दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठÎा प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. घटती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मंदिर खुली करण्यात आली आहेत. कार्यक्रमांना परवानगी देताना जास्तीत जास्त 200 जणांच्या उपस्थितिची अटही शिथील करून आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. नाटÎगफहे आणि चित्रपटगफहेही सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येचा अभ्यास करून दोन डोसच्या अटीतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय घेण्याचा विचार करण्यात येणार आहे.
लसीच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार सर्व क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होण्यास परवानगी देण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.