ऑनलाईन टीम / मुंबई :
काश्मीरमधील हत्यासत्र अद्याप सुरूच आहे. रविवारी दहशतवाद्यांकडून आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. आठवडाभरात दहशतवाद्यांनी 11 जणांची हत्या केल्याने तेथील परिस्थिती चिघळली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
राऊत म्हणाले, हत्यासत्रामुळे एकीकडे काश्मीरमधील परिस्थिती बिघडली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व ईडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत. ईडी, सीबीआय, एनसीबी व किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा, त्यांना दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही देऊ. बसतील जम्मू काश्मीर फिरत. खूप शक्तिशाली लोक आहेत दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत.
शरद पवारांविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांसंदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनाही नुसते खुर्च्यावर बसून चालणार नाही, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.