प्रतिनिधी /बेळगाव
अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आल्याने 1956 पासून आजतागायत सीमाभागात 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी भव्य सायकल फेरीही काढली जाते. केवळ बेळगावमध्येच नाही तर आता पुण्यामध्येही काळय़ा दिनाबाबत जनजागृती होताना दिसत आहे. पुण्यातील 50 हून अधिक ठिकाणी रविवारी काळय़ा दिनाचे फलक लावण्यात आले. सीमालढय़ाची माहिती महाराष्ट्रातील नागरिकांना व्हावी या हेतूने पुणे येथील बेळगाव मित्रमंडळ ट्रस्टने पुढाकार घेऊन पुण्यात सर्वत्र फलक लावले आहेत. कोथरूडच्या कर्वे चौक, अभिनव चौक, विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, जंगलीमहाराज रोड, डांगे चौक यासह पुण्यातील राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी फलक लावण्यात आले आहेत. सीमावासियांना लवकर न्याय मिळावा ही एकच इच्छा या फलकांमधून व्यक्त होत आहे. यासाठी बेळगावमधून पियूष हावळ यांनी सहकार्य केले.