सांबरा येथील बसवाण्णा तलावात घडली दुर्घटना : मोठय़ा बहिणीला वाचविण्यात यश
वार्ताहर /सांबरा
लक्ष्मी पूजेनंतर निर्माल्य तलावात टाकण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून अंत झाला. तर मोठय़ा बहिणीला वाचविण्यात यश आले. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सांबरा येथे बसवाण्णा तलावामध्ये घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
नेत्रा इराण्णा कोळवी (वय 8) व प्रिया इराण्णा कोळवी (वय 6) दोघीही राहणार महादेवनगर, सांबरा मूळगाव यद्दलगुड ता. गोकाक अशी दुर्दैवी मुलींची नावे आहेत. तर संध्या इराण्णा कोळवी (वय 10) हिला वाचविण्यात यश आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले व सध्या कारवार येथे डीएससी गार्ड म्हणून सेवा बजावणारे इराण्णा सिद्धाप्पा कोळवी यांनी दोन वर्षांपूर्वी महादेवनगर सांबरा येथे घर खरेदी केले आहे. तेव्हापासून ते आपली पत्नी व तीन मुलांसह येथे राहतात. सोमवारीच ते पंधरा दिवसांची सुटी संपवून सेवेत रुजू झाले होते. तर त्यांची पत्नी व तीन मुली यांनी दि. 4 नोव्हेंबर रोजी घरी लक्ष्मीपूजन केले होते. त्यानंतर त्या सर्व यद्दलगुडला गेल्या होत्या.
रविवारी दुपारी दीड वाजता गावावून परतल्यानंतर त्या मुलींच्या आईने पूजेसाठी वापरलेले साहित्य नजीकच्या तलावात टाकून येण्यास सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास त्या तलावामध्ये साहित्य टाकण्यासाठी गेल्या असता त्या तिघीजणी बुडाल्या व गटांगळय़ा खाऊ लागल्या. त्याचवेळी दुचाकीवरून जाणाऱया सुरेश शंकर कोलकार (रा. कामण्णा गल्ली, सांबरा) याला हा प्रकार निदर्शनास आला. त्याने कसलाही विचार न करता तलावात उडी घेतली व संध्याला बाहेर काढले.
तोपर्यंत तेथे तातडीने दाखल झालेले माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई, ग्रा. पं. सदस्य भुजंग गिरमल यांच्यासह मोहन डोळेकर आदींनी तलावात उडी घेतली व त्यांना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बेळगावला उपचारासाठी पाठविण्यात आले. यातील नेत्रा कोळवी (वय 8) हिचा वाटेत मृत्यू झाला तर प्रिया कोळवी (वय 6) हिचा उपचार सुरू असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला.
या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींचे मृतदेह सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या दोन्ही सख्ख्या बहिणींवर यद्दलगुड (ता. गोकाक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
घटनास्थळी तिघींच्या चप्पल पडल्या होत्या. संध्या व नेत्रा या केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थिनी होत्या. तर प्रियाही यावर्षी पहिलीमध्ये जाणार होती. मात्र शाळेला जाण्यापूर्वीच काळाने डाव साधल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तलाव, खोल खड्डय़ांचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेमुळे धोकादायक तलाव व खोल खड्डय़ांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या मुलांना कुठेही पाठविताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.