प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात ग्रामपंचायत सदस्यांचे पद रिक्त होते अशा 450 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तब्बल 786 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दि. 21 डिसेंबरला मतदान होत असून मतमोजणी 22 डिसेंबरला होणार आहे. त्याकरता 22 नोव्हेबरपासून ज्या गावची पोटनिवडणूक आहे तेथे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली आहे.
सातारा जिह्यात रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुका लागल्याची नोटीस दि. 22 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणे, दि. 30 नोव्हेंबर ते दि. 6 डिसेंबर अर्ज दाखल करणे, दि. 7 रोजी अर्जाची छाननी, दि. 9 रोजी चिन्ह वाटप, दि. 21 रोजी मतदान अन् दि. 22 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर दि. 27 डिसेंबरला निवडणुकीची अधीसुचना जाहीर करणे असा कार्यक्रम आहे.
सातारा जिह्यात सातारा तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीमध्ये 100 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीमध्ये 74 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. पाटण तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीसाठी 141 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. कोरेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमध्ये 70 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. वाई तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये 57 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. खंडाळा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी 19 रिक्तपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमध्ये 99 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. फलटण तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये 23 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. तर जावली तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीमध्ये 128 पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. माण तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी 15 जागासाठी पोटनिवडणूक होत आहे. खटाव तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी 59 जागासाठी असे जिह्यात 450 ग्रामपंचायतीमध्ये 786 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सातारा तालुक्यातील कोडोली, समर्थगाव, विजयनगर, निगडी तर्फ सातारा अशा 58 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश
जिह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत ही संपत आली आहे. त्याही निवडणुका लावण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी आदेश पाठवण्यात आला असून सध्या जिह्यात 64 जिल्हा परिषद सदस्य आहेत तर पंचायत समितीचे 124 सदस्य आहेत. काही भाग हा शहरात आलेला असल्याने गण आणि गट कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुधारित आदेश पुन्हा येण्याची शक्यता असून त्यानुसार पुन्हा प्रारुप आराखडय़ाच्या कामाला सुरुवात होईल असेही समजते.