ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील आंदोलनस्थळांवरुन शेतकरी घरी परतण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. जोपर्यंत एमएसपीबाबत कायदा होत नाही आणि शेतकऱ्यांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत कोणताही शेतकरी येथून जाणार नाही. आमची 4 डिसेंबरला बैठक आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आम्ही निघून जाऊ, असे राष्ट्रीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले.
टिकैत म्हणाले, कृषी कायदे रद्दचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील असे सरकारला वाटत होते. मात्र, एमएसपीबाबत कायदा आणि शेतकऱयांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्यानंतरच शेतकरी घरी परतणार आहेत. शेतकरी आंदोलनस्थळापासून घरी परतल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, शेतकरी कुठेही गेला नाही.
गाझीपूर, सिंघू, शाहजहानपूर आणि टिकरी सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरूच आहे.