मान्सून नंतरचा सुगीचा हंगाम संपला की, दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर रुप धारण करते, हा नित्याचाच अनुभव आहे. या प्रदूषणाला हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश या दिल्लीच्या शेजारी राज्यांमधलं पराली जाळणं कारणीभूत असतं, असं दिसून आलं आहे. पिकाची कापणी झाल्यानंतर तेथील शेतकरी पुढच्या हंगामासाठी जमिनीची मशागत सुरु करतात. मशागत करण्यासाठी कापणी केलेल्या पिकाचं शेतात उरलेलं गवत जाळलं जातं. त्याचा धूर वाऱयाबरोबर संपूर्ण दिल्ली शहरात पसरतो. तो किमान पंधरा दिवस कायम राहतो. अशी ही समस्या आहे. अनेकांनी त्यांच्या परीनं यावर तोडग्याचा प्रयत्न चालविला आहे. या गवतालाच तेथील भाषेत ‘पराली’ असं नाव आहे.
तथापि, हरियाणातील महेंद्रगढ येथील काही विद्यार्थ्यांनी शोधलेला तोडगा अतिशय प्रभावी आणि उपयुक्त ठरेल अशी चिन्हं आहेत. त्यांनी या परालीपासून भक्कम विटा बनविण्याचं तंत्रज्ञान शोधलं आहे. केवळ परालीच नाही तर वाया जाणाऱया काही औद्योगिक टाकाऊ पदार्थांचं मिश्रणही यासाठी उपयोगात आणलं जातं. त्यामुळं प्रदूषणाला चांगलाच चाप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रमेश बिश्नोई, शैलेश सिहाम आणि अक्षय कुमार अशी या शोधकर्त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्यांनी प्राध्यापक डॉ. विकास गर्ग यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करुन त्याची यशस्वी पूतर्ताही केली आहे. त्यांनी तयार केलेल्या विटा मातीच्या विटांपेक्षाही मजबूत आणि दीर्घकाळ टिकणाऱया आहेत, असं प्रतिपादन करण्यात आलं आहे. यामुळं विटांसाठी मातीचा उपयोग करावा लागणार नाही. तसंच पराली जाळाव्या लागणार नाहीत. दोन्ही दृष्टींनी हे संशोधन उपयुक्त आहे.