सरकारच्या विरोधात उभे राहिल्याने भाजपात महत्व घटले
प्रतिनिधी/ पणजी
मतदारांच्या घरादारांवर नांगर फिरवले जात असताना मी पहात राहू शकत नव्हते. म्हणुनच कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येणाऱया रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मी कडाडून विरोध केला आणि तेच भाजपला खटकले. तेव्हापासून पक्षात माझे महत्व कमी होऊ लागले. त्यातून माझी घुसमट होऊ लागली. त्यामुळे भाजप सोडून ’आप’ मध्ये प्रवेश केला, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा कुठ्ठाळीच्या भाजपा आमदार अलिना साल्ढाणा यांनी केले.
दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश करून गोव्यात परतल्यानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी राहूल म्हांबरे, ऍड. अमित पालेकर, सेसिल रॉड्रिग्स, वाल्मिकी नाईक व विघ्नेश आपटे यांची उपस्थिती होती.
रेल्वे दुपदरीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. लोकांच्या घरादारापर्यंत जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. एकुणच या प्रकल्पामुळे माझ्या मतदारसंघाचा पूर्णतः ऱहास होणार आहे. लोकांची शेकडो घरे नष्ट होणार आहेत. पर्यावरणाचा ऱहास होणार आहे. वायू-जल प्रदूषण वाढणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार पाहून मी गप्प राहू शकत नव्हते. खरे तर या प्रकल्पाचा गोमंतकीय आणि कुठ्ठाळीतील स्थानिकांना कोणताही फायदा होणार नाही, असा दावा साल्ढाणा यांनी केला.
लोकांनी आपले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणुनच प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदाराच्या विकासासाठी कार्यरत राहिले पाहिजे. तसे न केल्यास ती प्रतारणा ठरते. अशी प्रतारणा मी माझ्या मतदारांशी करू शकत नव्हते. त्यामुळे भाजपची नीतितत्वे काहीही असली तरी मी माझ्या तत्वांनुसारच निर्णय घेतला व मतदारांची साथ दिली. माझे पती माथानी साल्ढाणा हे आज हयात असते तर त्यांनीही तेच केले असते, मीही तेच केले. त्यामुळे भाजपचा जळफळाट झाला. तिन्ही लिनियर प्रकल्पांना विरोध करून सरकारच्या विरोधात बोलत असल्यामुळे मला बाजूला सारले जाऊ लागले. परंतु मी डगमगले नाही व वेळीच सखोल विचार करून आप मध्ये प्रवेश केला. मतदार माझ्या पाठिशी आहेत, असे साल्ढाणा यांनी सांगितले.
गत 10 वर्षात माझ्या मतदारसंघाचा सर्वार्थाने विकास करण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱयाच प्रमाणात यशही आले. त्यामुळे आगामी काळात व्यक्ती विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असे साल्ढाणा म्हणाल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली विकासकामे, निर्माण केलेल्या पायाभूत, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा, लोकांसाठीच्या विविध योजना, आदी पाहून मी भारावून गेले. दिल्लीत जे काही चालले आहे त्याचा सर्वसामान्यांना फायदा होत आहे. गोव्यात आपचे सरकार सत्तेवर आल्यास येथेही अशाच सुविधा व योजना लागू करणे शक्य होईल. मला माझ्या मतदारसंघात हेच हवे आहे, अशी माहिती साल्ढाणा यांनी दिली.
मॉविन गुदिन्होंची 20 वर्षांची कारकीर्द विकासशुन्य
दरम्यान, एका प्रश्नावर बोलताना साल्ढाणा यांनी पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यावर जोरदार टीका केली. 2002 मध्ये गुदिन्हो यांचा कुठ्ठाळीतून पराभव झाला होता, हे त्यांनी लक्षात ठेवावे. 20 वर्षांच्या कारकिर्दीत विकासशुन्य कामगिरी केलेल्या गुदिन्होबद्दल जनतेत प्रचंड चीड, तिटकारा होता. लोक त्यांचा तिरस्कार करत होते. त्यामुळे त्यांना दाबोळीला पळून जावे लागले हेच सत्य आहे, असे साल्ढाणा म्हणाल्या.
गुदिन्हो यांची मतदारसंघावर एवढी पकड होती तर त्यांनी कुठ्ठाळीतच राहायला हवे होते. दाबोळीला पळून का गेले? असा सवाल साल्ढाणा यांनी केला. कुठ्ठाळीची जागा जिंकण्यासाठी त्यांनी मला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. तसा दावा करण्यापूर्वी गुदिन्हो यांनी स्वतःची पार्श्वभूमी तपासावी, असे आव्हान साल्ढाणा यांनी दिले.