महाविकास आघाडीने कारणच ठेवले नसल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात, परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारचा राज्यात ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आवश्यक असणारे एकही कारण या सरकारने बाकी ठेवलेले नाही, असा आरोप करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिले. दरम्यान, परीक्षा घोटाळ्यांची सीबीआयतर्फे चौकशी झाली पाहिले, असेही त्यांनी म्हटले. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या संकेतामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले असून चंद्रकांतदादांचे हे संकेत आहे की गुगली याचीही चर्चा रंगली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने त्याची चौकशी करण्यास त्याच्या वर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. भाजपा ही मागणी लाऊन धरेल.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे एकही कारण बाकी नाही
चंद्रकांतदादा म्हणाले, राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घ्यायची असते. पण महाविकास आघाडीने तीन वेळा निवडणूक टाळली. या सरकारने राज्यपालांचे कुलगुरू नियुक्तीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्र्यांसाठी नवे पद निर्माण करून त्याचा दर्जा कुलगुरुंच्या वरती असावा असाही निर्णय घेतला. ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही कारण या सरकारने बाकी ठेवलेले नाही. तथापि, इंदिरा गांधी यांनी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपाचे नेतृत्व निर्णय घेत नाही, असे सूचक विधानही चंद्रकांतदादांनी केले.
गुजरातमध्ये कोणता उद्योग गेला ते देसाईंनी सांगावे
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळविल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल त्यांनी गेलेल्या उद्योगांची माहिती द्यावी, मोघम आरोप करू नयेत, असा टोलाही चंद्रकांदादांनी लागवला.
पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी अधिवेशनात आवाज
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करा या मागणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आगामी विधिमंडळ अधिवेशनात भाजपा आवाज उठवेल असे चंद्रकांतदादा पाटील सांगितले.
संजय राऊत सरकारचे प्रवक्त… इतर सर्व बाजूला
गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत संपादक, संजय राऊत प्रवक्ते, संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते पाहायला मिळाले. सगळ्यांना बाजूला केलं गेलें आहे. त्यामुळे शिवसेनेतील घुसमट बाहेर पडेल. उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही, असा चिमटाही चंद्रकांतदादा पाटील यांनी काढला.