भारतीय राजनयिकाला केले पाचारण
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
हरिद्वारमध्ये अलिकडेच पार पडलेल्या धर्मसंसदेत कथितरित्या मुस्लिमांच्या विरोधात भडकाऊ वक्तव्ये करण्यात आल्याप्रकरणी पाकिस्तानकडून टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने भारतीय राजनयिकाला पाचारण केले. भारतातील नरेंद्र मोदी सरकार द्वेषपूर्ण भाषणं करणाऱयांवर कारवाई करत नसल्याचा कांगावा पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने केला आहे.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने स्वतःच्या वक्तव्यात फेब्रुवारी 2020 मधील दिल्लीत झालेल्या दंगलींचा देखील उल्लेख केला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघ, ओआयसी आणि संबंधित मानवाधिकार संघटनांसह आंतरराष्ट्रीय समुदायाला अल्पसंख्याकांच्या मानवाधिकार उल्लंघनासाठी भारताला जबाबदार ठरविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानच्या वृत्तपत्रांनीही हरिद्वारमधील धर्मसंसदेवर अनेक लेख प्रकाशित केले आहेत.
पाकिस्तानात हिंदू, शीख, ख्रिश्चनांवर अनन्वित अत्याचार होत असल्याचे पूर्ण जगाला ज्ञात झाले आहे. तेथील हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार आता वारंवार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पाकिस्तानातील सत्ताधारी सोयीस्कर मौन बाळगतात. स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांचा छळ होत असताना पाकिस्तान भारतासंबंधी मुद्दा उपस्थित करून जगाचे लक्ष विचलित करू पाहत असल्याचे मानले जातेय.