लंका-पाकिस्तान यांच्यात होणार दुसरा उपांत्य सामना
वृत्तसंस्था/ शारजाह
यू-19 आशिया चषक स्पर्धेत भारताची उपांत्य लढत बांगलादेशविरुद्ध होणार असल्याचे निश्चित झाले. मंगळवारी बांगलादेश व लंका यांच्यात गटातील शेवटचा साखळी सामना होणार होता. पण दोन सामनाधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना रद्द करण्यात आला. गुरुवारी 30 रोजी उपांत्य सामना होणार आहे.
गट ब मधील शेवटच्या सामन्यातील 32.4 षटकांचा खेळ झाला होता. पण दोन सामनाधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे एसीसीने सांगितले. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर बांगलादेशने 32.4 षटकांत 4 बाद 132 धावा जमविल्या होत्या. यावेळी मिळालेल्या कोरोनाच्या वृत्तानंतर हा सामना थांबवण्यात आला, तेव्हा अरिफुल इस्लाम 19 व मोहम्मद फहीम 27 धावांवर खेळत होते. बांगलादेश व लंका दोन्ही संघांनी याआधीच उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यातून फक्त गटविजेता निश्चित होणार होता. बांगलादेशने सरस धावगतीच्या जोरावर गटात पहिले स्थान मिळविले. दुसरा उपांत्य सामना लंका व पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारताच्या युवा संघाने ही स्पर्धा चार वेळा जिंकली तर 2016 व 2020 मध्ये उपविजेतेपद मिळविले आहे.