नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीला मंगळवारपासून सुरुवात
प्रतिनिधी /बेळगाव
ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंगळवार दि. 28 पासून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेळगावात अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, रात्री 8 पासूनच पोलिसांच्या गाडय़ांचे सायरन वाजल्याने नाराजी व्यक्त झाली.
शहरातील मुख्य बाजारपेठ खडेबाजार, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, समादेवी गल्ली परिसरात पोलीस सायरन व शिटय़ा वाजवत व्यवहार बंद करण्याचे आवाहन करत होते. वास्तविक रात्री 10 वाजता दुकाने तसेच व्यवहार बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र दीड ते दोन तास आधीच पोलिसांनी व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारने 7 जानेवारी 2022 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. बेळगाव जिल्हय़ामध्ये ओमिक्रॉन रुग्णांची संख्या कमी असली तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्फ्यू पाळलाच पाहिजे. जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने याची दखल घेत कर्फ्यूच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असली तरी वेळेच्यापूर्वीच दुकाने किंवा व्यवहार बंद करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी होत आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे मोठय़ा आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी गाडी रुळावर आली असतानाच पुन्हा अचानकपणे कर्फ्यू सुरू केला आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. नियम पाळू, मात्र वेळेनुसारच त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाने दहशत किंवा दडपशाही करू नये, अशी मागणी होत आहे.