ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या आठ राज्यांना केंद्राने पत्र लिहून विशेष सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणाला गती द्यावी तसेच त्याची व्याप्ती वाढवावी. रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी, मृत्यूदर वाढू नये यासाठी कठोर पाऊले उचलण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीत लागू करण्यात आलेले जीआरएपी मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केंद्राकडून केला जात असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, शरीरात वेदना, चव किंवा वास कमी होणे, थकवा ही कोरोनाची लक्षणे मानली गेली पाहिजेत, असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार अशा सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी. त्यांचा तपासणी अहवाल येईपर्यंत अशा लोकांनी स्वत:ला त्यापासून वेगळे करावे, अशाही सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत.