दिवसभरात 91 हजार नवे रुग्ण : देशात सक्रिय रुग्णसंख्या 2 लाख 85 हजारांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत झपाटय़ाने रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. मात्र, पॉझिटिव्ह आढळणाऱयांमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे उपचार घेणाऱयांची संख्या फारच कमी असल्याने देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या संक्रमितांची संख्या दररोज नवी उंची गाठताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याचे दिसून येत आहे. 1 जानेवारी 27 हजारांवर असलेला आकडा केवळ 5 जानेवारीपर्यंत 91 हजारांवर पोहोचल्याने संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2 लाख 85 हजार 401 वर पोहोचली आहे. अशातच मृतांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 876 वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात 19 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 41 हजार 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंतच्या एकंदर बाधितांचा आकडा 3 कोटी 51 लाख 9 हजार 286 इतका झाला आहे.
8 राज्यांमध्ये धोकादायक स्थिती
देशात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रवेशानंतर, कोरोना महामारीचा वेग अचानक सहापट वेगाने वाढत आहे. 29 डिसेंबर रोजी देशात दररोज 9 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळत होते, ज्यांची संख्या 8 दिवसांनंतर म्हणजेच बुधवारी 58 हजारांवर पोहोचली आहे. त्यानंतर गुरुवारी हा दैनंदिन आकडा 90 हजारांवर पोहोचला होता. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुजरात या आठ राज्यांमध्ये संसर्गात वेगाने वाढ होत असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
28 जिल्हय़ांमध्ये सकारात्मकता दर 10 टक्केपेक्षा जास्त
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशातील 28 जिल्हय़ांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दरात 10 टक्केपेक्षा जास्त वाढ नोंद झाली आहे. तसेच 43 जिल्हय़ांमध्ये संसर्गाचा दर 5 ते 10 टक्क्मयांच्या दरम्यान नोंदवला गेला आहे. देशभरात 29 डिसेंबर 2021 रोजी 0.79 टक्के असलेला सकारात्मकता दर 5 जानेवारीपर्यंत 5.03 टक्केच्या पातळीवर पोहोचला आहे.
उपचार घेणाऱयांची संख्या नियंत्रणात
देशात संसर्ग वाढल्यानंतरही रुग्णालयात दाखल होणाऱयांची संख्या सध्या नियंत्रणात आहे. पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरही अतिगंभीर प्रकृती असलेले फारच कमी रुग्ण इस्पितळांमध्ये दाखल आहेत. साहजिकच सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमध्ये दिलासा देणारी बाब आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेला घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरीने शिस्तीचे पालन करून पुढील प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.