तोडगा काढण्याच्यादृष्टीने 100 हंगामी कामगारांना घेवून प्रशिक्षण देण्याचा निर्णय : नगरसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारपासून बेळगाव शहरातील व्हॉल्वमन संपावर गेल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी समस्येबाबत तोडगा काढण्याच्यादृष्टीने 100 हंगामी कामगारांना घेवून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पाणीपुरवठा कामगार संपावर गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्यादृष्टीने महापालिका कार्यालयात शुक्रवारी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक, महापालिका, पाणीपुरवठा मंडळ, एलऍण्डटी कंपनीचे अधिकारी आणि आमदार अनिल बेनके यांचा समावेश होता. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने हंगामी कामगारांसोबत चर्चा करण्यात आली. मात्र संप मागे घेण्यास कामगार तयार नसल्याने पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण झाली आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱयांना घेवून पंEिपग स्टेशन, जलशुद्धिकरण प्रकल्प तसेच विविध कामकाज सुरू आहे. पण विविध भागात पाणीपुरवठा करण्यास व्हॉल्वमन उपलब्ध नाहीत. त्यावर तोडगा काढण्यासाठी हंगामी तत्त्वावर स्वयंसेवक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत प्रकटन जाहीर करण्यात आले होते. याला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासह पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने बैठकीत तोडगा काढण्याकरिता चर्चा करण्यात आली आहे.
या सभेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाणीपुरवठा खंडित होऊ नये याकरिता निवृत्त झालेल्या व्हॉल्वमनना पुन्हा तात्पुरते कामावर घेऊन बेळगाव उत्तर मतक्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 50 कामगारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन येत्या 2 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना एलऍण्डटी कंपनीला करण्यात आली. उत्तर मतक्षेत्रातील नादुरुस्त कूपनलिकांची चार दिवसात दुरुस्ती करून पाणीपुरवठा करण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी अधिकाऱयांना केली.
संपावरील कामगारांवर कारवाईचा इशारा
याप्रसंगी नगरसेवकांनी आपल्या वॉर्डमधील समस्या मांडल्या. याबाबत अधिकाऱयांशी चर्चा करून समस्यांचे निवारण करण्यात आले. संपावर गेलेल्या कर्मचाऱयांना परत कामावर रुजू होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न केले, पण कर्मचाऱयांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे संपावर गेलेल्या कामगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. संपावर गेलेल्या कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, पण 5 लाख जनतेला पिण्याच्या पाण्याचा त्रास देऊ नये, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच येत्या काळात सर्व गल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येईल, नगरसेवक व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुदेश घाळी, एलऍण्डटी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी केले.