प्रतिनिधी/सातारा
चार भिंतीच्या लगतच असलेली झोपडपट्टी म्हणजेच कोल्हाटीवस्ती. या कोल्हाटी वस्तीतून समोर पाहिले तर पालिकेची इमारत चटकन डोळयात बसते. परंतु पालिकेकडून मिळणाऱया मुलभूत सोयीसुविधा सगळयात उशिरा किंवा पोहोचतही नाहीत, अशी खंत येथील नागरिक वारंवार व्यक्त करतात. कधी कधी लेखी स्वरुपात तर कधी कधी तोंडी स्वरुपात पालिकेकडे तक्रारी मांडलेल्या आहेत. स्वच्छतेचे तर तीन तेराच वाजलेले आहेत. खासदार उदयनराजेंनी जी संरक्षक भिंत मंजूर केली ती एका बाजूला तशीच ठेवून ठेकेदाराकडून दुसऱयाच बाजूला काम सुरु करण्यात आले आहे. विकास केवळ सुरु असलेल्या भिंतीमध्ये अडकला काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
सातारा शहरातील प्रत्येक नागरिक हा पालिकेचा कर भरतो. त्यामुळे त्यांना मुलभूत सुविधा मिळणे हे आद्य कर्तव्य आहे. परंतु पालिकेच्या मुख्य इमारतीपासून 500 मीटर अंतरावर कोल्हाटी वस्ती आहे. या वस्तीला सोयी सुविधाच तशा लवकर दिल्या जात नाहीत. स्वतः हक्कासाठी येथील नागरिकांना लेखी अर्ज करावे लागतात. पालिकेकडे मागणी करावी लागते. तेव्हा कुठे सगळयात उशिरा या वस्तीकडे पालिका प्रशासन लक्ष देते. सातारा पालिकेचे सार्वजनिक शौचालय या वस्तीत आहे परंतु त्या शौचालयात लाईट नाही, पाणी नाही, दारे तुटलेली आहेत. घरातूनच पाणी न्यावे लागते. या शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी याच वस्तीतील नागरिकांना करावी लागते, अशी खंत ही येथील नागरिकांनी व्यक्त केली. तसेच खासदार उदयनराजेंनी या वस्तीच्या संरक्षणासाठी डोंगरभागातून पावसाळय़ात संरक्षण मिळावे म्हणून भिंत मंजूर केली. परंतु त्या भिंतीऐवजी ठेकेदाराला काम सोपे पडावे म्हणून अन्य ठिकाणी भिंतीचे काम मंजूर होऊन तेथे काम केले जात आहे, असेही समोर आले आहे.