अध्याय तेरावा
आपल्या मनात एखादी इच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वभावात सत्व, रज किंवा तम यापैकी ज्याचा जोर असेल त्यानुसार आपण धडपडत असतो आणि आपली ती इच्छा पूर्ण होईल की नाही याविषयी आपले चित्त चिंता करत असते कारण आपल्या चित्ताला इच्छा पूर्तीचा ध्यास लागलेला असतो. म्हणून चित्त आणि इच्छा एकमेकात रुतून बसलेल्या असतात. चित आणि विषयपूर्तीसाठी होणाऱया इच्छा यांना वेगळं कसं करायचं असा प्रश्न सनकादिकांनी ब्रह्मदेवांना विचारला होता पण त्यांनाही उत्तर देता आलं नाही. कारण त्यांनी केलेल्या सृष्टीनर्मितीच्या कार्यामुळे त्यांना फळाची अपेक्षा निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला होता. आपल्या मुलांच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही म्हणून त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं. ब्रह्मदेव हे भगवंतांचे पुत्रच होते. मुलाचे महत्व राखण्यासाठी भगवंत प्रकट झाले आणि त्यांनी प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, माणसाच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने मी वास करत असतो.
आत्मा अलिप्त असल्याने त्याला चित्त आणि विषय यांच्याशी काही देणेघेणेच नसते, पण मनुष्य तर चित्त आणि विषयपूर्ती यातच अडकून पडलेला असतो. त्यासाठी करत असलेल्या खटपटीने माणसाचा आत्मा त्यात गुंतून जातो आणि त्याचे मूळ स्वरूप विसरतो. म्हणून साधकाने आपण ईश्वरीस्वरूप आहोत हे लक्षात घ्यावे म्हणजे त्याला होणाऱया इच्छातून त्यांच्या पूर्तीसाठी बुद्धी जे नाना प्रकारचे स्वार्थी विचार करत असते ते बंद होतील आणि तिला आत्मनात्म विवेक म्हणजे काय योग्य, काय अयोग्य हे कळू लागेल. यासाठी प्रथम इच्छा करणे बंद होणे आवश्यक आहे. इच्छा जर बंद झाल्या तर आत्म्यावर पडणारे बुद्धीचे बंधन तुटेल आणि त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचा परस्परसंबंध संपुष्टात येईल. त्यावर कुणाला असा प्रश्न पडेल की, आत्मा जर अलिप्त आहे तर मग विषयात गुंतून का पडत असेल? या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, बुद्धी मुळात जड आहे तिला आत्मा चैतन्य शक्ती पुरवत असतो. त्यामुळे ती निरनिराळे संकल्पविकल्प करत असते आणि ते आपणच करत आहोत असा भ्रम आत्म्याला होतो. एक उदाहरण देतो. समजा एखादा माणूस झोपाळय़ावर बसलेला आहे. तो खरं तर स्वस्थ बसलेला असूनही झोपाळय़ाच्या हालल्यामुळे हालत असतो, आनंदाने वरखाली झोके घेतो व हौसेने झोपाळय़ाबरोबर हालत राहतो. तो मोठमोठाले झोके घेत असला तरी त्या वेळी वस्तुतः केवळ झोपाळाच जोरजोराने मागेपुढे हालत असतो आणि बसणारा आपल्या ठिकाणी स्थिरच असतो पण त्याला आपण हलतोय असं वाटत असतं. झोपाळय़ावर बसलेल्या माणसांप्रमाणेच जीवाची अवस्था होते. स्वतः अलिप्त असला तरी तो स्वतःला कर्ता समजत असतो. ज्याप्रमाणे स्वप्नामधील घटना जागे होईपर्यंत खऱया वाटतात पण जाग आल्यावर त्या खोटय़ा होत्या हे लक्षात येते. त्याप्रमाणे घर, बायको, वगैरे सर्व आपलीशीच वाटत असतात आणि अहंमतेच्या अभिमानानेच तिन्ही अवस्था मी भोगत आहे असे तो मानतो. वास्तविक देह जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यातील आत्मतत्व एकच असते पण माणूस मात्र मी आणि माझे ह्या विचाराच्या कल्पनेने भारलेला असतो. माणसाची कल्पना कशी चालते त्याचे आणखी एक उदाहरण देतो. लोखंडाचे काम करताना कामगार लोखंडाला तापवतात. त्यामुळे लोखंड लालबुंद झालेले दिसते आणि लोखंडावर घातलेले घाव प्रत्यक्ष विस्तवाच्याच माथ्यावर घातलेत असं वाटतं. अग्नीच्या संगतीने लोखंडाचे काम घडते पण प्रत्यक्षात अग्नि हा घडतही नाही आणि मोडतही नाही. अग्निप्रमाणे जीवही, येथे अलिप्ततेने राहिलेला असतो आणि त्याच्या संगतीने शरीराच्या हालचाली घडत असतात. ज्याप्रमाणे अग्नीशिवाय लोखंड घडत नाही त्याप्रमाणे आत्म्याशिवाय बुद्धी कोणताच विचार करू शकत नाही कारण ती जड आहे. आत्म्याशिवाय तिला कोणतीच कर्मक्रिया कधीही करता येणार नाही.
क्रमशः