मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींचे युवाशक्तीला आवाहन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाला वाळवीप्रमाणे पोखरुन दुर्बळ बनविणाऱया भ्रष्टाचाराला थारा देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे केले आहे. नव्या वर्षातील प्रथमच मन की बात रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित करण्यात आली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
ज्या निर्धाराने देशाने कोरोनाच्या तिसऱया उद्रेकाशी संघर्ष केला आणि या उद्रेकाला हाताबाहेर जाऊ दिले नाही, तो निर्धार अतिशय कौतुकास्पद आहे. लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर देशव्यापी पद्धतीने हाती घेतल्यानेच हे शक्य झाले. 15 ते 18 या वयोगटातील साडेचार कोटी मुलांचे लसीकरणही देशाने अवघ्या साध्य केले आहे.
भ्रष्टाचार हा देशाला आतून पोकळ करुन त्याचे सामर्थ्यहनन करीत आहे. भ्रष्टाचाराची ही कीड लवकरात लवकर दूर केली जाणे आवश्यक आहे. जनआंदोलनाच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षात देशातील युवाशक्तीने प्रमुख भूमिका साकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
अमर जवान ज्योती
अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण राष्टीय युद्ध स्मारकात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच क्रियान्वित केला आहे. त्यासंदर्भातही पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मध्ये भाष्य केले. ज्यांना शक्य असेल त्यांनी सहकुटुंब राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट द्यावी. येथे आल्यानंतर आपल्याला एका विशेष ऊर्जेचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही. अमर जवान ज्योतीसंबंधीही अनेकांनी आपल्याला पत्रे पाठविली आहेत. या भावनांचा आदर आपण करतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गांधी पुण्यतिथी
30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजींची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस त्यांचा स्मरण दिवस म्हणून पाळला जातो. पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी नुकताच साजऱया झालेल्या गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमाचाही उल्लेख भाषणात केला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
यंदा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढा हा आपल्या साऱयांच्या अभिभानाचा विषय आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले त्यांच्या त्यागाची आठवण आपण स्वातंत्र्यदिनी करतो. यंदाचे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे साऱया देशात एक नवाच उत्साह संचारला असून देशाच्या कानाकोपऱयात त्याचे प्रत्यंतर येत आहे, असे प्रतिपादन केले.
भारत ही ज्ञानभूमी
भारत ही पुरातन काळापासून ज्ञान आणि शिक्षण यांसाठी जगभरात ओळखला जातो. आपण ही परंपरा अधिक जोमाने जोपासली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, रविद्रनाथ टागोर, बडोद्याचे गायकवाड महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अरविंद घोष आदी शिक्षणपेमी व्यक्तीमत्वांचा गौरवही त्यांनी केला.
राजघाटावर म. गांधींना श्रद्धांजली
मत की बात पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाली होती. हे त्यांच्या पुण्यतिथीचे 74 वे वर्ष आहे. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे हे आपल्या साऱयांचे कर्तव्य आहे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.