ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. देशात गेल्या २४ तासात २ लाखाहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात १ लाख ६७ हजार ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १७ लाख ४३ हजार ५९ इतकी झाली. तर रिकव्हरी रेट हा ९४.६० टक्के इतका झाला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला असून तो ११.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासात देशात १ लाख ६७ हजार ५९ नवे रुग्ण आढळून आले. तर याचवेळी २ लाख ५४ हजार जणांनी कोरोनावर मात केली. देशात बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ९२ लाख ३० हजार १९८ इतकी आहे. सध्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांची संख्या ही ४.२ टक्के इतकी आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे ११९२ जणांचा मृत्यू झाला आहे.