पंतप्रधान मोदी यांचे ‘जन चौपाल’ सभेत आवाहन
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उत्तर प्रदेशात अनेक वेळा निवडणूक झाली आहे. तसेच येथील लोकांनी अनेक सरकारे बनलेली आणि पडलेली पाहिली आहेत. तथापि, यंदाची विधानसभा निवडणूक ही प्रथमच अशी आहे, की ज्या निवडणुकीत जनतेची सुरक्षा, सन्मान आणि समृद्धी पणाला लागली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कायदा-सुव्यवस्था, आर्थिक प्रगती आणि सामाजिक सुरक्षा या तीन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून जनतेला हा अनुभव येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपचा प्रचंड विजय होईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जन चौपाल’ सभेत शुक्रवारी काढले.
त्यांनी या व्हर्चुअल सभेच्या माध्यमातून गाझियाबाद, हापुड, मेरठ आणि अलीगढ या चार जिल्हय़ांमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पक्षाचे नेते आणि उमेदवार यांच्याशीही संवाद साधला. या सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरही सहभागी झाले होते.
दंगेखोर, माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड हे आपल्या सरकारचे ध्येय होते. ते साध्य करण्यात गेल्या पाच वर्षांमध्ये मोठे यश आले आहे. आज राज्यातील जनता, विशेषतः महिला बऱयाच प्रमाणात सुरक्षित आहेत. गुन्हय़ांचे आणि संघटित गुन्हय़ांचे प्रमाण कमी झाले आहे. ही निवडणूक ‘हिस्ट्री शीटर्स’ना बाहेरचा रस्ता दाखवून ‘हिस्टरी’ घडविण्यासाठीची आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या सभेला भाजप समर्थकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
मतदारांना आवाहन
राज्यातील विकास कामे आणि कायदा सुव्यवस्था अशीच राहण्यासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची संधी द्यावी. राज्यात आज कधी नव्हे इतकी सुरक्षितता निर्माण झाली आहे. हेच कार्य पुढे सुरु राहणे आवश्यक असून त्यासाठी पुन्हा भाजपला सत्ता मिळणेही आवश्यक आहे. आर्थिक आघाडीवरही आज उत्तर प्रदेश सुस्थिरतेकडे वाटचाल करीत आहे. राज्यात विदेशी गुंतवणूक वाढत असून नवे कारखाने आणि औद्योगिक उत्पादन केंद्रे स्थापन होत आहेत. हीच प्रक्रिया आणखी प्रदीर्घ काळ सुरु राहिली तर तिचे कायम स्वरुपी लाभ मिळणार आहेत, हे राज्यातील सूज्ञ मतदार जाणतो. त्यामुळे भाजपला आणखी संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचे आवाहन केले.
आर्थिक गोंधळ संपविला
सप आणि बसपच्या सरकारांच्या काळात राज्यातील 21 सहकारी साखर कारखाने विकण्यात आले होते. तथापि, भाजपच्या पाच वर्षांच्या काळात एकाही साखर कारखान्याची विक्री करण्यात आली नाही. उलट साखर क्षेत्र अधिक बळकट करण्यात आले. इतर औद्योगिक क्षेत्रांमध्येही मोठय़ा प्रमाणात स्थिरता आली असून व्यापार आणि उत्पादन या दोन्ही आघाडय़ांवर राज्य प्रगती करीत आहे. पायाभूत सुविधा विकास झपाटय़ाने होत असून महामार्ग आणि जलमार्गांचे निर्माण कार्य वेगाने होत आहे. विकासाची ही गंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी भाजपलाच प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
10 ला पहिला टप्पा
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा होत आहे. अद्यापही मोठय़ा जाहीर सभांवर कोरोना परिस्थितीच्या कारणास्तव बंदी आहे. मात्र उमेदवार आ&िंण कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहेत. तसेच छोटय़ा सभा आणि मर्यादित संख्येचे रोड शो यांच्या माध्यमातून जनसंपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 58 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून मतदानाचे एकंदर सात टप्पे होणार आहेत.