प्रतिनिधी/ सातारा
निर्भया निर्भया निर्भया हे नाव ऐकताच भल्या भल्या टवाळखोरांना घाम फुटत होता. निर्भया पथक फिरत असल्याचे कळताच अनेकांनी धुम ठोकलेली होती. परंतु या निर्भया पथकांच्या कारवाईचा धडाका आता थंडावलेला पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे निर्भया पथक आहेत तरी कुठे असे म्हणण्याची वेळ आली आहे. वायसी कॉलेज परिसरात असणाऱया निर्भया पोलीस चौकीसमोर गुन्हे घडत असल्याने निर्भया पथकाचे युवकांना उरले नाही भय अशीच काहीशी परिस्थिती पाहीला मिळत आहे.
महाविद्यालय परिसरात तसेच प्रवासादरम्यान मुली-महिलांना सुरक्षितता वाटावी म्हणून मुंबईचे सहाआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा शहरातील वायसी कॉलेज परिसरात महाराष्ट्रातील पहिली निर्भया पोलीस चौकीची उभारणी केली होते. या चौकीमुळे टवाळखोरांच्या चांगल्या मुसक्या आवळण्यात येत होत्या. सतत होणाऱया कारवाईचा धडाका सुरू असल्याने भय मुक्त वातावरणात महाविद्यालयात युवती येत होत्या. पोलीस अधीक्षक ते सामान्य लोकांनी निर्भया पथकांच्या कामाचे कौतुकही केले होते. परंतु सगळेच दिवस सारखे राहत नाहीत, या म्हणीप्रमाणे आता निर्भया पथकांचे काम थंडावले की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. वायसी कॉलेज परिसरात युवकांच्या दोन गटात हाणामारी झाल्याच्या घटनेने तर निर्भया पथकावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
चौकी समोर असताना युवकांनी धारदार शस्त्र घेवून भांडणे केल्याने चौकीतील पोलिसांनी लक्ष का दिले नाही. तसेच पूर्वीप्रमाणे महाविद्यालय परिसरात पेट्रोलिंग का होत नाहीत. निर्भया पथक हे मुली-महिलांच्या सुरक्षितेसाठी असल्याने अनेक महिला अधिकाऱयांची नेमणूक या पथकांच्या प्रमुख म्हणून करण्यात आल्या. त्यांची बदली होताच ही जबाबदारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलीस उपअधिक्षक आंचल दलाल यांच्या खांद्यावर सोपवली. परंतु पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल या महिला असल्याने त्या आणखी जबाबदारीने मुलीच्या सुरक्षितेवर लक्ष केंद्रीत करतील असे वाटत होते. पण तसे न होता त्या कधी महाविद्यालय परिसरात किंवा निर्भया चौकीत गेल्या का ? हे पथकातील पोलीसांनाही नीट आठवत नाही.
चौकीचा प्रमुख नेमण्यास उशीर आली जाग
उपअधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्विकारून बरेच दिवसे झाले आहेत त्यांनी पदभारापलिकडे जावून ठोस काम आणि कारवाईचा आलेख अद्याप चढलेला नाही. महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडून ज्या प्रकारे ठोस कामाची अपेक्षा होत आहे. ती कामे थंडावल्याने पुन्हा महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यांनी निर्भया पथकांच्या प्रमुखांची अद्याप नेमणूक का केली नाही. हा मोठा प्रश्न आता त्यांच्या कामकाजावर ताशेरे ओढत आहे.