आगोंद परिसरातील प्रकार, स्थानिकांकडून तीव्र नाराजी
प्रतिनिधी /काणकोण
जागतिक पर्यटन नकाशावर सुंदर किनारा म्हणून नावारूपाला आलेल्या आगोंद किनाऱयावर भेट द्यायला येणाऱया देशी-विदेशी पर्यटकांवर सध्या रस्त्याच्या बाजूला बेकायदा टाकलेल्या कचऱयाचे दर्शन घेऊन जाण्याची पाळी आली आहे. राष्ट्रीय हमरस्ता 66 वरून आगोंद भागाकडे जाणारा बगलरस्ता, करमल घाट आणि गुळे भागात सध्या सर्वत्र किनारपट्टीवर चालविण्यात येणाऱया शॅक्स आणि रेस्टॉरंटमधील कचरा टाकण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आगोंद पंचायतीने घरोघरी कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय आगोंद बगलरस्ता ते गुळेपर्यंतच्या भागाच्या सफाईसाठी अतिरिक्त कामगारांची नियुक्ती केलेली आहे. असे असताना आगोंद बगलरस्त्यावर सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. काणकोणच्या बिगरसरकारी यंत्रणेने यापूर्वी तालुक्यातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारतानाच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत. असे असताना या भागात कचरा टाकण्याचे प्रकार वाढलेले असून आगोंद पंचायतीचे सरपंच बादल ना. गावकर यांनी याबाबतीत लक्ष दिले आहे. रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला कचरा टाकताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काही स्थानिक ग्रामस्थांशी याबाबतीत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाळोळे, आगोंद किनाऱयांवरील बहुतेक व्यवसाय आता परप्रांतीयांच्या हातात गेलेले आहेत. या रेस्टॉरंट वा शॅक्समध्ये काम करणारे कामगार देखील परप्रांतीय आहेत. रस्त्यावर जे लोक कचरा टाकतात त्यात याच परप्रांतीय कामगारांचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकून परिसर विद्रुप करण्याच्या प्रकारास आक्षेप घेतला आहे. यामुळे गावचे नाव खराब होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.