अध्याय चौदावा
निरनिराळय़ा मोक्ष साधनांबद्दल भगवंत उद्धवाला सांगताना म्हणाले, सत्व, रज, तम गुणांनी प्रभावित झालेले शास्त्रीपंडीत निरनिराळय़ा प्रकारच्या साधनांची भलावण करतात. त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी अनेक साधने आहेत असा गैरसमज लोकांच्यात पसरला आहे.
कुणी म्हणतात, निष्काम कर्म हेच मोक्षप्राप्तीसाठी मुख्य साधन होय. कवी म्हणतात, निरनिराळय़ा कविता, पद्ये आणि त्यांची रचनापद्धती ह्यांत मिळविलेल्या कीर्तीनेच मोक्ष मिळतो. कुणी म्हणतात, कामाच्या सुखोपभोगाने मोक्ष मिळेल. सांख्य म्हणतात, सत्य, शम, दम, इत्यादि मोक्षाची साधने आहेत. काहीजण, राज्य प्राप्त झाले की, तोच मोक्ष असे समजतात. नास्तिक म्हणतात, इच्छेप्रमाणे मिळतील ते सर्व भोग खुशाल भोगून घ्यावेत. कुठला स्वर्ग आणि कुठला नरक ? मेल्यानंतर पुन्हा कोण जन्माला येते ? तर कुणाला यज्ञात मोक्षमार्ग दिसत असतो. मूर्तीपूजा करणे, हेच काही जणांना मोक्षमार्गाचे साधन वाटते. कोणाचे मत असे की, खडतर कष्ट सोसून व अनेक प्रकारच्या यातना सोसून देह झिजवून केलेले तप हाच मोक्षाचा अगदी जवळचा मार्ग होय. कोणी म्हणतात की, दान करणे हेच काय ते मोक्षमार्गातील श्रे÷ साधन आहे. याज्ञिक म्हणतात की, व्रतस्थपणाने राहणे हेच मोक्षाचे साधन होय.
काही जणांच्या मते, व्रत, नियम, हे मोक्षासाठी अवश्य पाळावेत. अशा प्रकारे आपापल्या मताप्रमाणे अनेक प्रकाच्या साधनांची थोरवी लोक सांगत असतात. पण ह्या सर्व साधनांच्या स्थितीचा विचार केला, तर ती सर्व नाशवंत आहेत. नाशवंत साधनांनी ईश्वराची उपासना करून अविनाशी ईश्वर कसा प्राप्त होईल ? असा विचार कुणाच्याही मनात येत नाही. त्यामुळे त्यांची नाशवंत साधने मोक्षप्राप्तीसाठी निरुपयोगी ठरतात. हे लक्षात घेऊन जे फलाची आशा व देहाचा अभिमान सोडून आपले साधन मला अर्पण करावे जे असे करत नाहीत, त्यांच्या साधनांचे फळ दुःखदायक असते. ते पुनःपुन्हा जन्ममरण देते. त्या साधनांनी जमा होणाऱया पुण्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत मनुष्य जाऊन पोहोचतो पण हे सारे परलोक नाशवंत आणि क्षणिक असेच असतात. त्या लोकातील सुख म्हणजे साखरेच्या पाकात शिजवलेले विष होय. सुरवातीला ते गोड वाटते पण शेवटी दुःख हे ठेवलेलेच. त्याप्रमाणे त्या लोकातील आनंदही क्षुद्र असून तो सर्वस्वी शोकालाच कारण होतो असे समज. आपल्या कर्मानेच जे लोक मलिन झाले आहेत, त्यांना सुख कसे मिळणार ? सुख मिळणे तर दूरच त्यात उत्तरोत्तर वाढत जाणारे दुःखच असते. त्यामुळे शेवटी अंधतम नांवाचा नरक प्राप्त होतो. जे मन भोगांना आसक्त झाले, त्याला विषयांचाच अखंड ध्यास लागलेला असतो. त्या विषयाच्या ध्यासानेच तमोगुण वृद्धि पावून अधःपतन होते पण वर सांगितलेल्या साधनांनी जो कोणी अत्यंत प्रेमाने माझी भक्ती करतील, त्याना मिळणाऱया आत्मसुखाची महती मी तुला सांगणारच आहे पण त्याआधी माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणाऱया भक्ताचा स्वभाव कसा असतो ते समजून घे. सामान्य माणसाला जीवनात मिळणाऱया भोगांचे मोठे आकर्षण असते पण माझा भक्त सर्वस्वी वेगळा असल्याने भोग भोगणे तर दूरच त्या भोगांचे विचारसुध्दा त्याच्या मनात येत नाही. तसेच परलोकातही कुठे स्थान मिळावे असे त्याला वाटत नाही.
जे फळ प्राप्तीच्या अपेक्षेने भक्ती करतात ते त्यांच्या पुण्यसंचयाच्या प्रमाणात वैकुंठलोकाच्या अलीकडील ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोहोचतात पण त्यांचा पुण्यसंचय संपला की, त्यांना माघारी फिरावे लागते तेथे त्यांचे काहीही न चालता परत येऊन जन्म घ्यावा लागतो पण जे सतत माझ्याशी जोडलेले असतात, त्याना केवळ माझाच ध्यास लागतो. त्यांना इतर कोणतीही इच्छा होत नाही अगदी परलोकाचीही त्यांना इच्छा नसते. कुणी ब्रह्मलोक देतो म्हंटलं तर तोही ते मनापासून नाकारतात. थोडक्मयात माझ्या स्वरूपाच्या बदल्यात कितीही मूल्यवान गोष्ट मिळत असली तरी ते सहजी ती बाजूला सारतात.
क्रमशः