जवळपास दहा ट्रॉली गवताचे नुकसान
प्रतिनिधी /येळ्ळूर
घराच्या पाठीमागील बाजूस रचलेल्या दोन गवत गंजीना आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत दहा ट्रॉली गवत जळून खाक झाल्याने दोन शेतकऱयांचे जवळपास साठ हजाराचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने जनावरांचा गोठा बचावला आहे.
सुळगे येथील गजानन बेळवटकर व पिंटू बेळवटकर यांनी जनावरांसाठी घराच्या पाठीमागील बाजूला गवतगंज्या रचल्या होत्या. रविवारी दुपारी अचानक यामधील एका गवत गंजीला आग लागली. ती आग दुसऱया गवत गंजीलाही लागली. ही घटना काहींच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले. तत्पूर्वी अग्निशमन दलाला कळविण्यात आले होते. त्यामुळे काही वेळातच पाण्याचे बंब घेऊन जवान दाखल झाले. त्यांनी फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत दोन्ही गवत गंजी जळून खाक झाल्या होत्या.