प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावरील मंदीरात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करावेत. यामध्ये ई-पास पध्दत बंद करावी, तसेच मंदिराचे चारही दरवाजे खुले करावेत, अशी मागणी श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर समस्त गावकर-गुरव-पुजारी सेवाभावी संस्थेतर्फे सोमवारी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवार (दि.11)पासून जोतिबा येथे बेमुदत धरणे आंदोलन पेले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावरील मंदीरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. एकाच दरवाजातून ई-पासद्वारे भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. परंतु आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटविले आहे. तसेच धार्मिकस्थळे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही जोतिबा मंदीरातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मंदीर प्रवेशासाठी असणारा ई-पास बंद करावा व मंदीराचे चारही दरवाजे खुले करावेत. अन्यथा शुक्रवार (दि.11)पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येईल.
निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव, पन्हाळा प्रांताधिकारी, शाहुवाडी-पन्हाळाचे पोलीस उपअधिक्षक, पन्हाळा तहसिलदार, केदारलिंग देवस्थान व्यवस्थापन कार्यालय प्रभारी आदींनाही सादर करण्यात आल्या. या निवेदनावर 50 हून अधिक जणांच्या सह्या आहेत.