कोरोनाचा शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम : 287 शाळांमध्ये एकही ऍडमिशन नाही
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असून शैक्षणिक क्षेत्रावर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील तीन वर्षांत 750 खासगी व विनाअनुदानित शाळांनी आपले शटर बंद केले आहे. विद्यार्थीच नसल्यामुळे 287 शाळांमध्ये ऍडमिशन झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत पाठविण्याचा कल या काळात दिसून आल्याने विनाअनुदानित शाळांवर ही परिस्थिती ओढवली आहे.
प्राथमिक व माध्यमिक विभागातर्फे विधानसभेत ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात एकूण 77 हजार शाळा असून, यापैकी 50 हजार शाळा सरकारकडून चालविल्या जातात. 285 प्राथमिक शाळा तर 2 हायस्कूलमध्ये मागील तीन वर्षांत एकही प्रवेश झालेला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला जात होता. लाखो रुपये फी भरून ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याने बऱयाच पालकांनी आपल्या पाल्यांना खासगी शाळेतून काढून सरकारी शाळांमध्ये दाखल केले. यामुळे मागील दोन वर्षांत सरकारी शाळांमधील पटसंख्येत कमालीची वाढ झाली होती. याचाच परिणाम खासगी विनाअनुदानित शाळांच्या पटसंख्येवर झाला. प्रवेश घटल्यामुळे शाळांना मिळणारा महसूल कमी झाला. यामुळे शाळांनी आपले शटर बंद केले.
तुमकूर जिल्हय़ात सर्वाधिक शाळा बंद
तुमकूर जिल्हय़ात सर्वाधिक शाळा बंद झाल्या आहेत. जिल्हय़ातील 48 शाळांचे शटर बंद झाले आहे. हासन व गुलबर्गा येथे 26, बिदर येथे 25, चिक्कमंगळूर येथे 18, चामराजनगर येथे 13 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा चालविणे व शिक्षकांचे पगार देण्यासाठी व्यवस्थापन मंडळाकडे निधी असणे आवश्यक आहे. परंतु ऍडमिशनच होत नसेल तर निधी कुठून येणार? कोरोनामुळे खासगी शाळांना मोठा फटका बसला असून, सरकारने खासगी शाळांना मदत करावी, अशी मागणी खासगी शाळा संघटनेतर्फे केली जात आहे.