महाड येथील चवदार तळयाच्या सत्त्याग्रह दिनानिमित्त ‘सलाम संविधान’ गीतांचा महाजलसा
कोल्हापूर प्रतिनिधी
‘आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे’, ‘देखो ऊसे, ढुंढो ऊसे इस जगत का बुध्द है’ यासह अन्य स्वरचित व प्रचलित भिमगीतां सादरीकरणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. गायक कबीर नाईकनवरे यांनी व त्यांच्या साथीदारांनी गायलेल्या गीतांनी बिंदू चौक भिममय झाला होता. टाळय़ा आणि बोला डॉ. आंबेडकर की जय, महाडच्या तळय़ाच्या सत्याग्रहाचा विजय असो… अशा घोषणांनी आंबेडकरप्रेमींनी गायकांना दाद दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 साली महाडच्या चवदार तळयाचा ऐतिहासिक सत्याग्रह करून अस्पृश्यांना नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांवर समान हक्क मिळवून दिला. महाडचा सत्याग्रह दिनानिमित्त अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने बिंदू चौकात ‘सलाम संविधान’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बोधीवृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून भिमगीतांच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली.
गायक कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सलाम संविधान’ अंतर्गत सुमधुर बुध्द व भीमगीतांची सुरूवात बुध्द वंदनेने केली. गायक कबीर यांना सहगायक मंदार पाटील, रविराज सदाजय, प्रविण राघवन, दर्शन सुतार, आकाश शिंदे, रोहन मस्के, विश्वनाथ चौगुले, ओमकार भिसे, कौस्तुभ भिसे, स्नेहल सातपुते, प्राजक्ता शिरोळकर, शुभांगी लब्यागोळ यांनी साथ केली. त्यांच्या गायलेल्या ‘आम्ही आंबेडकर…’, ‘लिहली घटना.., ‘माझ्या भिमराया’ यासह अन्य भीमगीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तसेच मंदार पाटील लिखित ‘चालतो हा देश…‘ या नवीन गाण्याचे लाँचिंग केले. निवेदक प्रविण बनसोडे यांनी चवदार तळयाचा सत्याग्रहाचे महत्व सांगितलेच. परंतू छत्रपती शिवाजी महाराज जातीसाठी नव्हे तर रयतेच्या मातीसाठी कसे लढले यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. बिंदू चौक परिसरात रविवारी सायंकाळी एकच भिमगीतांचा आवाज घुमला होता. यावेळी आनंदा भोजने, मच्छिंद्र कांबळे, बाळासाहेब भोसले, डॉ. महेंद्र कानडे, डॉ. अलोक जत्राटकर, डॉ. शरद गायकवाड, सुशिलकुमार कोल्हटकर, भिमराव तांबे आदी उपस्थित होते.