एफआयआर दाखल : अधिकाऱयांकडून घटनास्थळाची पाहणी
कोलकाता / वृत्तसंस्था
बंगालच्या बीरभूम हिंसाचारप्रकरणी शनिवारी सीबीआयने 21 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. 70-80 लोकांनी पीडितांच्या घरांची तोडफोड केली आणि त्यांना जाळण्यासाठी घरांना आग लावल्याचे सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 21 मार्च रोजी बीरभूम जिह्यातील बोगतुई गावात जमावाने आठ लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठार केले होते. यापूर्वी शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाने सीबीआयला 7 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सीबीआयचे एक पथक शनिवारी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिह्यातील बोगतुई गावात दाखल झाले. या पथकाने हिंसाचाराचा तपास सुरू केला आहे. 21 मार्च रोजीच्या घटनेत महिला आणि मुलांसह किमान आठ लोकांचा मृत्यू झाला होता. सीबीआयचे सुमारे 20 सदस्य शनिवारी घटनास्थळी पोहोचले होते. तसेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या एका युनिटनेही घटनास्थळी पाहणी करत नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.