ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
सिसोदिया यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”काही अराजकतावादी लोकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा आणि सिक्मयुरिटी बॅरियरची तोडफोड केली आहे. शिवाय त्यांच्या घराला भगवा रंग देखील फासण्यात आला आहे. भाजपचे गुंड तोडफोड करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी गेटपर्यंत येऊ दिलं, ” असंही सिसोदिया यांनी म्हटले आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याविरोधात भाजपकडून केजरीवालांविरोधात निदर्शने सुरू होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. दुपारी एकच्या सुमारास या आंदोलनकर्त्यांनी तेथील बॅरीयर्स तोडून केजरीवालांच्या निवासस्थानाबाहेर पोहचले. तेथील गेटला भगवा रंग लावत, सीसीटिव्ही कॅमेऱयांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले आहे.