कोल्हापूर : प्रतिनिधी
चंद्रकांत पाटील सारख्या व्यक्तीची गरज महाराष्ट्राला आहे. आपल्या सोयीचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेल तर बंटी पाटील! तुम्हाला काय प्रॉब्लम आहे. तुमच्या त्रासामुळेच ते पुण्याला गेले. असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, अण्णा जातील आणि आपल्यावर हा प्रसंग येईल असं वाटलं नव्हते. स्वतःच्या विजयाची मिरवणूक सुरू असताना गॅसचा स्फोट झाल्यानंतर आण्णा लगेच धावून गेले. अशी आठवण पाटील यांनी सांगितली. महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले की भाजपची धूळधाण उडाली आहे. भाजपच्या हातात देश गेला आणि महागाईचा आगडोंब झाला.
पेट्रोलचे दर थोडे जरी वाढले तरी भाजप रस्त्यावर यायचे पण आता 117 रुपये पेट्रोल करून ठेवलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या खिशातून हे पैसे जात आहेत. या देशात महागाईवर चर्चा होत नाही, या देशात भावनांना हेलकावे देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपला माहीत आहे की जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय आपलं काही चालत नाही. कायदा हातात घ्यायचा आणि विरोधकांना त्रास द्यायचं सुरू आहे. हसन मुश्रीफ ऐकत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. भाजपवाले आमचं सरकार पडण्याचे स्वप्न बघतात. असा टोला पाटील यांनी लगावला.
माध्यम आमच्या बातम्या दाखवत नाहीत. या देशात न्याय कुणाकडे मागायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वतःला निवडून येता येत नाही म्हणून एमआयएमची मदत घेऊन भाजप लढत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या 86 जागा अगदी थोड्या मतांनी पडल्या. असेही पाटील म्हणाले.
महाराष्ट्राला चंद्रकांतदादा पाटील यांची गरज आहे. असा माणूस जास्त वेळ भाजपचा प्रदेशाध्यक्ष असणं हे आपल्या सोयीचं आहे. असा सोयीचा माणूस असेल तर सतेज पाटील तुम्हाला अडचण काय? अशी जयंत पाटील यांनी खोचक टीका केली. आमच्या तिन्ही पक्षात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी अडीच वर्षे सरकार चाललं आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.