केरळचे अव्वल स्थान कायमच : दिल्लीने घेतली द्वितीय स्थानी उसळी,आंध्र प्रदेश घसरले शेवटच्या स्थानावर
प्रतिनिधी /पणजी
देशात साक्षरता स्तरावर आपले अव्वल स्थान कायम राखण्यात केरळ राज्य यंदाही यशस्वी ठरल्याचे दिसून आले असून अन्य सर्व राज्यांना मागे टाकत दिल्लीने द्वितीय स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत गोवा राज्य चौथ्या स्थानी पोहोचले आहे. महत्वाचे म्हणजे सर्वात कमी साक्षर राज्यात बिहारच्या जागी आंध्र प्रदेशचा क्रमांक लागला आहे.
नुकत्यात प्रकाशित करण्यात आलेल्या गोव्याच्या 2011 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती प्राप्त झाली आहे. बिहारची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे 61.80 टक्के एवढी होती. त्यात वाढ होऊन बिहार 70.9 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर 66.4 टक्क्यांसह आंध्र प्रदेश शेवटच्या स्थानावर घसरले आहे.
गोवा चौथ्या स्थानावर
2001 च्या जनगणनेनुसार गोव्यात 82.01 टक्के लोक साक्षर होते. 2011 मध्ये ती टक्केवारी 87.4 टक्क्यांवर पोहोचली तर 2021 मध्ये 88.7 टक्के एवढे साक्षरता प्रमाण नोंद झाले. त्यात 83.3 टक्के पुरूष आणि 76.4 टक्के महिला साक्षरांचा समावेश होता.
दिल्लीने घेतली उसळी
2011 च्या जनगणनेनुसार केरळचा साक्षरता दर 94 टक्के होता. त्यात सुमारे 96.11 टक्के पुरुष आणि 92.07 टक्के महिला साक्षर असल्याचे स्पष्ट झाले होते. वर्ष 2022 पर्यंत हा दर 96.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. गत दहा वर्षात दिल्लीनेही साक्षरता स्तरावर चांगलीच उसळी घेतली असून लक्षद्विपला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. दिल्लीत सुमारे 88.7 टक्के लोक साक्षर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा वर्षांपूर्वी 16व्या स्थानी असलेले उत्तराखंड राज्य 87.6 टक्क्यांसह तृतीय स्थानी पोहोचले आहे
आसामनेही घेतली गरुडझेप
या क्रमवारीत आसामनेही मोठी गरुडझेप घेतली असून 26व्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी पोहोचले आहे. 2011 मधील 72.2 या टक्केवारीवरून आता ते राज्य 85.9 टक्क्यांवर पोहोचले आहे. तेथील साक्षर पुरुष आणि महिलांची टक्केवारी अनुक्रमे 77.85 आणि 66.27 एवढी नोंद झाली आहे.
महाराष्ट्र सहाव्या स्थानी
गत दहा वर्षात महाराष्ट्राच्या एकुण टक्केवारीत केवळ 2 टक्के साक्षरांची भर पडली आहे. तरीही राष्ट्रीय स्तरावर त्यांनी 12व्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. या राज्याचा विद्यमान साक्षरता दर 84.8 टक्के एवढा आहे. त्यात 88.38 टक्के पुरुष आणि 75.87 टक्के महिलांचा समावेश आहे.
अन्य राज्यांच्या साक्षरतेत वाढ
2011 मध्ये 21व्या स्थानी असलेले पंजाब, 17व्या स्थानी असलेले गुजरात, आणि 19व्या स्थानी असलेले पश्चिम बंगाल ही राज्ये 2021 मध्ये साक्षरता दरात अनुक्रमे सात, आठ आणि नवव्या स्थानी पोहोचली आहेत. पंजाबमध्ये 83.7 टक्के, पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातमध्ये 82.4 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये 81.69 टक्के लोक साक्षर असल्याचे स्पष्ट झाले आहे.